देह, देश आणि परमेश्वरामध्येच आयुष्याचे सार सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचे उपसंचालक निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने शौर्य पुरस्कार सोहळा
पुणे: आजचे युवा हे राष्ट्रनिर्माते, भारताचे भविष्य आहेत. भारताची चार तत्त्वे एकात्मता, संवेदनशीलता, भक्ती, परिपूर्णता यामुळे भारताची ओळख आहे. ही तत्वे शिक्षणामध्ये आणली नाहीत, तर भारताचे अस्तित्व धोक्यात येईल. प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, त्यामुळे एकात्मता आवश्यक आहे. ‘देह, देश आणि परमेश्वर’ हे तीन शब्द नेहमी लक्षात ठेवावेत. ह्याच तीन गोष्टींमध्ये आयुष्याचे खरे सार दडलेले आहे.असे मत सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याचे उपसंचालक निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस च्या वतीने ७ व्या शौर्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी निवृत्त एअरमार्शल अविनाश क्षीरसागर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यावेळी उपस्थित होते. पोलीस अंमलदार विशाल दळवी, संदीप शिर्के, दयानंद तेलंगे पाटील, मारुती पारधी यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सतेश हिंगे म्हणाले, संवेदनशीलता जपत स्वतःच्या गरजा कमी करुन इतरांचा विचार करायला हवा. यश मिळाल्यावर अहंकार जवळ येतो; तो टाळण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. खरी भक्ती म्हणजे घेणे नव्हे, तर देणे होय. चौथे तत्त्व म्हणजे परिपूर्णता जे काही करू, ते उत्तमपणे करायला हवे.
अॅड. शार्दूल जाधवर म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा नारा पुण्यातून गेला. पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. परंतु आज तरुण-तरुणींमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढताना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये थोर महात्म्यांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. जर शिक्षणपद्धतीत हे शिकवले गेले नाही, तर आपण पुढे जाणार नाही. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये थोर आणि महान व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास बंधनकारक करावा, असेही त्यांनी सांगितले. अविनाश क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.