पुणे शहराच्या विकासासाठी शिवाजीराव मानकरांचे आहे हे व्हीजन

पुणे- लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना पुणे शहरातीलही राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. सत्ताधारी भाजप पक्षाच्या निरीक्षकांचा दौरा, इच्छुकांच्या मुलाखती, आढावा बैठकांचे आयोजन केले जात आहे. ‘अब की बार 400 पार’चा नारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांनीही उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.

भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव मानकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर इच्छुक आहेत. या यादीमध्ये दिवसागणिक इच्छुकांचे नाव वाढत आहे.

एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणारा पुणे लोकसभा मतदार संघ आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. अनिल शिरोळे, स्व. गिरीश बापट यांच्या रूपाने भाजपने आपले पुणे लोकसभेवर आपले स्थान बळकट केले आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीमध्येही रस्सीखेच असल्याचे दिसते आहे. अर्थात पुणे लोकसभेचे नेतृत्व करणारा खासदार हा पुणे शहराचा विकासाच्या दृष्टीने पुढील 25 वर्षांचा विचार करणारा असावा असा एक सूर नागरिकांशी बोलताना जाणवतो.

भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी कोणी त्यांच्या पुण्याच्या विकासाच्या व्हीजन बद्दल जाहीर वाच्यात केली नसली तरी यातील एक इच्छुक शिवाजीराव मानकर यांनी मात्र ते खासदार झाल्यास त्यांचे पुणे शहरासाठी काय व्हीजन असेल हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना शिवाजीराव मानकर म्हणाले, ‘एकच मिशन,पुणे नंबर वन’ हे आमचे ब्रीदवाक्य घेऊनच मी खासदार म्हणून काम करणार आहे. त्या अनुषंगाने पुणे शहराचे माझे व्हीजन हे चार गोष्टींवर फोकस असेल. दिल्लीनंतर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून पुण्याचे वर्णन करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त पुणे शहर हे पहिले मिशन असेल. त्यानंतर नदीचे प्रदूषण ही देखील एक मोठी समस्या आहे त्यामुळे स्वच्छ नदी हे माझे दुसरे मिशन असेल. प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्लास्टिकमुक्त पुणे शहर हे माझे तिसरे मिशन असेल आणि सुरळीत वाहतुकीसाठी मेट्रोचे जाळे वाढवण्याचाही माझा प्रयत्न असेल. पुणे शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’ शहरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार पुण्याचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करणे हे माझे मुख्य ध्येय आहे. याशिवाय शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असणारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे विकासाला कायमच प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार तसेच राज्याच्या पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि चंद्रकांतदादा पाटील या विकासाला आणि चांगल्या कामाला नेहेमी प्राधान्य देणाऱ्या नेत्यांच्या मदतीने पुणे शहराचे विकासाचे व्हिजन साकार करू, असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Translate »