‘मिशन ऊर्जा’द्वारे भोर, वेल्ह्यातील गावे उजळण्यास तयार..
धबधब्यांपासून ‘शाश्वत ऊर्जा’..
पुणे: भोर, वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागांतील गावांना वीजेची भेडसावणारी ही समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. वीज ऊर्जेबाबात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काही ध्येयवेड्या तरुणांनी हाती घेतलेला ‘मिशन ऊर्जा उपक्रम पुर्णत्वास आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात गावकऱ्यांना शाश्वत उर्जेचा प्रकाश मिळणार आहे. वेल्हे तालुक्यातील घेवंडे, गेळगाणी,धोपेखिंड ही गावे तर चांदवणे या भोर तालुक्यातील गावात हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
धबधब्याचे पाणी एका साठवण तलावात साठवून या पाण्यावर सात ते आठ महिने वीजनिर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पातून वर्षभरात १६ ते २२ हजार किलोवॅट वीजनिर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे.
डोंगर रागांतून धबधब्याच्या रुपात पडणारे पाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून पाइपाद्वारे १२० ते १६० क्युबिक वेगाने पाणी सोडून टर्बाईन चालवून वीजनिर्मिती होत असून गावातच याचे पॉवरस्टेशन आहे. तेथूनच प्रत्येक घरात वीज पोहचविण्याची व्यवस्था आहे. एका तासाला ५ किलोवॅट वीजनिर्मितीची क्षमता या प्रकल्पाची आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही ग्रामस्थांना नाममात्र भावात वितरित केली जाणार आहे. १ ते १.३० रुपये घेतले जाणार आहे. महावितरणच्या दरापेक्षा हे दर कमी आहे. गावात ऊर्जा समित्या स्थापन करून, त्याद्वारे याचे नियोजन केले जाणार आहे. एका प्रकल्पाला १० लाख खर्च असून, सामाजिक दायित्व निधीतून प्रकल्प पूर्ण केला गेला आहे. या प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले. यावेळी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन, किर्लोस्कर ब्रदर्स, नेटक्रॅकर, इमरीस इंडिया, रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये ज्या ठिकाणी वीज आहे, त्या ठिकाणी वीजपुरवठा नियमित होत नाही. कधी लोड शेडिंग तर कधी पावसामुळे अचानक दोन-तीन दिवस वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे ‘स्वदेश या चित्रपटापासून प्रेरित होत पावसाळ्यात धबधब्याचे पाणी साठवून त्यावरून वीजनिर्मिती केली गेली आहे. कॉर्पोरेट कंपन्या, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांच्या सहभागातून सहा गावांमध्ये ‘मिशन ऊर्जा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. भोर, वेल्हा तालुक्यांतील ६ गावे स्वतः तयार केलेल्या विजेने उजळून निघणार आहेत.
ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष तन्वीर इनामदार म्हणाले की, पावसाचा जोर वाढला की गावातील वीजपुरवठा दोन-तीन; तर कधी आठवडाभर खंडित होतो. वीज नसल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय आम्ही पाहिली. वर्षभर विविध कारणांमुळे विजेची समस्या सुरू असते. ‘स्वदेश’ चित्रपट आम्ही पाहिला होता. हाच धागा पडकत, आम्ही दुर्गम गावे विजेत स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. ‘मिशन ऊर्जा’ उपक्रमातून आम्ही गावकऱ्यांना त्यांच्या हक्काची आणि त्यांच्या गावात तयार होणारी वीज देणार आहोत. या उपक्रमासाठी काही गावकऱ्यांनी स्वतःची जमीन दिली आहे; तसेच देखभाल खर्चाची रक्कमही लोकसहभागातूनच उभी राहणार आहे.
पर्सिसस्टंट फाउंडेशनच्या अधक्षा सोनाली देशपांडे मनोगतामध्ये तन्वीर आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे खूप कौतुक केले. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अशा अनेक प्रकल्पांसाठी पर्सिसटंत फाउंडेशन कायम मदत करतील असे वचन दिले.
किर्लोस्कर फाउंडेशनचे भावेश कंसारा म्हणाले, ”पावसाळ्यातील चार महिन्यांत गावातच तयार होणारी वीज गावकऱ्यांना आठ ते दहा महिने पुरणार आहे. वर्षाला १६ हजार ते २२ हजार किलो वॉट ऊर्जानिर्मितीचे ध्येय आम्ही ठेवले आहे. विशेष म्हणजे उपक्रमाला सुरुवातीपासूनच गावकऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळते आहे.’
गेळगाणी सरपंच रघुनाथ जानकर म्हणाले की, ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन च्या मदतीने गावातल्या अनेक समस्या दूर झाल्या. अंधारात जनावर आणि इतर अनेक धोके होते, परंतु मिशन ऊर्जा मुळे गावकऱ्यांना खूप मदत झाली आहे.