‘आमचं ठरलंय’, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पुणे: महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्याचे मतदान हे उद्या पार पडणार आहे. तत्पूर्वी काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून नागरिकांच्या भेटीगाठीवर जोर देण्यात आला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी देखील उद्या मतदान पार पडणार असून महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, वंचितकडून वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनिस सुंडके हे प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरात मशिदीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी फतवे काढले जात असल्याचा मुद्दा जोरदारपणे चर्चिला जात आहे. यामध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत हिंदू मतदारांना केलेल्या आवाहनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मशिदीमधून फतवे दिले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर एका बाजूला टीकेची झोड उठली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत याच मुद्द्यावरून रान पेटवल आहे. “जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मशिदी मधून फतवे निघणार असतील, तर मी पुण्यातील समस्त हिंदू मतदारांना फतवा काढतो, की त्यांनी मुरलीधर मोहोळ आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं” असं राज ठाकरे म्हणाले. जाहीर सभा आणि प्रचारावर निर्बंध आले असले तरी ठाकरे यांच्या सभेनंतर सोशल मीडियावर मात्र “आमचं ठरलय” चा ट्रेंड पहायला मिळतोय.

नेमका काय आहे ट्रेंड?

‘जय श्रीराम आमचं ठरलंय’ असे वाक्य लिहिलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये वाक्यांच्या मागे अयोध्येतील राम मंदिर आणि ज्ञानवापीतील मंदिराचे फोटो लावण्यात आले आहेत. हा ट्रेंड महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी फायद्याचा असल्याच दिसत आहे. राज ठाकरे यांच्या सभेमध्ये गाजलेला फतव्याचा मुद्दा आणि सोशल मीडियावर सुरू असणारा ट्रेंड महायुती अन् मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी फायद्याचा असला तरी विरोधी उमेदवारांना मात्र डोकेदुखीचा ठरणारा आहे.

Leave A Reply

Translate »