‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’ निमित्त टेक फोरमतर्फे आयोजित परिषदेत तज्ज्ञांचा सूर; विलास रबडे यांचा पुढाकार
पुणे : “इलेक्ट्रिक वाहन (ई-व्हेईकल-ईव्ही) उद्योग झपाट्याने वाढत आहे. भारतात या उद्योगाला मोठ्या संधी आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत ई-व्हेईकल उपलब्ध होणे काळाची गरज आहे. ‘ईव्ही’ची कार्यक्षमता, सुरक्षितता वाढवण्यासाठी संशोधन व प्रगत तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल,” असा सूर तज्ज्ञांनी आळवला.
टेक फोरम संस्थेच्या वतीने ‘ईव्ही टेक्नॉलॉजी डे’ निमित्त नुकतेच एकदिवसीय परिषद व चर्चासत्राचे आयोजन केले होते. येरवड्यातील क्रिएटिसिटी (ईशान्य मॉल) येथे आयोजित विसाव्या पुणे ऑटो एक्स्पोमध्ये दिवसभर ११ सत्रात तज्ज्ञांनी या विषयावर मंथन केले. एकूण ८० जणांनी यात सहभाग नोंदवला.
डॉ. यशोधन गोखले, हेमंत पाध्ये, अभय फणशीकर, सचिन वाघ, प्रमोद चौधरी, डॉ. मारुती खैरे, आशुतोष पटवर्धन, शिरीष कुलकर्णी, काजल राजवैद्य, अनिरुद्ध बर्वे, डॉ. मनोज मोदाणी, अभय पटवर्धन, काजल राजवैद्य, विवेक सहस्रबुद्धे, अनंत भेडसगावकर, अद्वैत गोखले, जयवंत महाजन, विक्रांत वैद्य, राजीव रणदिवे, मकरंद पारखी आदी तज्ज्ञांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले.
टेक फोरमचे विलास रबडे म्हणाले, “विद्युत वाहन क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना एकत्रित आणून नवकल्पना, अनुभव व ‘ईव्ही’चा वापर वाढविण्यासह त्याची क्षमता, त्यातील संशोधन व किंमती आदी गोष्टींवर चर्चा झाली. या क्षेत्रातील आव्हाने व संधी, विद्युत वाहन परिसंस्थेला गती देण्याचे मार्ग, ‘इव्ही’चे भविष्य, बॅटरीमधील पर्याय, बॅटरी टेक्नॉलॉजी, उत्पादनांची सुरक्षा आदी विषयांवर तज्ज्ञांनी उहापोह केला. या वाहनांना लागणाऱ्या आगीच्या संदर्भातही तज्ज्ञांनी मते मांडली.”