घनकचरा व्यवस्थापन कार्यपद्धती, नियोजनामध्ये स्पष्टता हवी
कंत्राटदाराने घनकचरा व्यवस्थापनाचा स्पष्ट आराखडा सादर करावा; काकासाहेब चव्हाण यांची मागणी
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या टाकाऊ कचऱ्याचे काय होणार, याबाबतही कंत्राटदार किंवा प्रशासनाने कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. तसेच हे कंत्राट सुरुवातीला केवळ तीन महिन्यांसाठी देण्यात येत असून, त्यानंतर ते सुरू राहिले नाही तर या कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कंत्राटदाराने शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाचा संपूर्ण आराखडा, तांत्रिक क्षमता, प्रक्रिया व्यवस्था आणि कामकाजाची पद्धत याबाबत सर्व नगरसेवकांसमोर सविस्तर सादरीकरण करावे, अशी आमची मागणी आहे. मात्र या मागणीलाही प्रशासन आणि कंत्राटदाराकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे चव्हाण यांनी नमूद केले.
या निविदेमध्ये महानगरपालिकेतील कायमस्वरूपी झाडणकामगारांच्या सेवा, जबाबदाऱ्या, कार्यक्षेत्र आणि भविष्यातील भूमिकेबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. भविष्यात स्वच्छता व्यवस्थेचे संपूर्ण खासगीकरण झाल्यास त्यांच्या सेवा, हक्क, रोजगाराची सुरक्षितता, पदनियोजन आणि अनुकंपा नियुक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या हिताचे संरक्षण करणारे स्वतंत्र धोरण तातडीने जाहीर करावे. सार्वजनिक निधीचा काटेकोर वापर सुनिश्चित करण्यासाठी रस्त्यांची लांबी, मनुष्यबळ, वाहनांची संख्या, सेवा शुल्क, प्रशासकीय खर्च आणि इतर सर्व आर्थिक बाबींचे स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करूनच निविदेला अंतिम मंजुरी द्यावी, अशी भूमिका काकासाहेब चव्हाण यांनी मांडली.

Comments are closed.