पुणे : दिलीप वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होतो आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांच वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तु आमदार कसा होतो तेच बघतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार अशोक पवार यांना आव्हानच दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अशोक पवार यांच्यावर जोरादर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, घोडगंगा कारखाना अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढता येऊ शकेल. मात्र संचालक मंडळ एकत्रित हवे. अमोल कोल्हे सेलिब्रेटी आहेत. असे सांगून पाच वर्षात लोकांकडे गेले नाहीत. असेही अजित पवार म्हणाले.
तुमचे प्रश्न केंद्र आणि राज्य एकक्षित सोडवू शकते. शरद पवारांनी शिरूरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवलंय. त्यामुळे ते आपल्यासोबत नाहीत. अजित पवारांने जर ठरवलं तर एखाद्याला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देत. तुझी औकात काय आहे? असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना दम देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अजित पवारांच्या टिकेला अशोक पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अशाप्रकारे दम देणे योग्य नाही. अजितदादांनी त्यांची ही शक्ती कांद्याला चांगला बाजार भाव, शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली तर सर्वांनाच आनंद होईल. असा टोलाही त्यांनी लगावला.