घोडेगाव : मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी एकही प्रकल्प आपल्या भागात आणला आही. जी कामं ते आपल्या सोशल मिडियावर दाखवत असतात, ती मी मंजूर केलेल्या प्रकल्पांची कामे आहेत. काम करणं अवघड आहे अन् कामाचा अभिनय करणं खूप सोप आहे. मागील 15 वर्ष काम मी केलं अन् मागील पाच वर्षात त्यांनी फक्त काम केल्याचा अभिनय केला. तुम्ही त्यांच्या भूल थापानां बळी पडू नका, असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले.
शिरूर लोकसभा मतदार संघात पाटील यांच्या प्रचारासाठी घोडेगाव, ता. आंबेगाव, पुणे येथे माहायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आढळराव बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, कोणतीही कामे एक दोन महिन्यात होत नाहीत. माजी रेल्वे मंत्री मधू दंडवते हे कोकणातील असून सुद्धा कोकण रेल्वे सुरू व्हायला 28 वर्ष लागली. अन् ह्यांचा पोपट म्हणतो दोन महिन्यात प्रकल्प सुरू होतो. आजवर या भागात झालेले प्रकल्प हे माझ्या 15 वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आहे. आगामी काळात शिरूर लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रकल्पाचे काम मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी कमीत कमी 25 हजार कोटींची गरज आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी चाकणच्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर निवडून गेलेल्या ‘या’ खासदाराने नंतर त्या वाहतूक कोंडीकडे वळूनही पाहिले नाही. वाघोली, शिकरापूर आणि लोणी काळाभोरच्या ही वाहतुकीचा प्रश्न तसाच आहे. हा रास्ते वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ही मोठ्या निधीची गरज आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असेल तरच हे प्रश्न सोडविणे शक्य होणार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी निष्ठे बद्दल, स्वाभिमानाबद्दल बोलत नाही तर मी विकासावर बोलतो. मात्र तो फक्त निष्ठे बद्दल बोलतो. ज्या व्यक्तीने आपल्या कारकिर्दीत पाच पक्ष बदलले त्याला निष्ठे बद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे. राजकारणात निष्ठा फक्त जनतेशी ठेवली पाहिजे. त्याच निष्ठेमधून कोणतेही पद नसताना मी केंद्रातून निधी आणला आहे.