शिरूर मतदारसंघात 5 वर्षे खासदार नसताना देखील परिसरातील गावांना मोठा निधी मिळवून दिला – आढळराव पाटील

पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कायमच कटीबद्ध असतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्रापुर-अवसरी रस्ता माझ्या प्रयत्नातूनच झाला आहे. असं म्हणत मंत्री दिलीपराव वळसे पाटील आजारी असले तरी त्यांचे सर्व मतदार संघातील बाबींवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढचे काही दिवस सक्रिय राहावे व आपले मताधिक्य जास्तीत-जास्त कसे वाढेल हे पाहावे. असे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देखील जोरदार घणाघात चढवला.

शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौरा केला. यावेळी त्यांचं गावकऱ्यांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी करून तसेच ढोल-ताश्या व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, ”मी 15 वर्षे खासदार असताना व मागील 5 वर्षे खासदार नसताना देखील परिसरातील गावांना मोठा निधी मिळवून दिला आहे. मला तुमच्याकडे मते मागण्याचा अधिकार आहे. समोरचा विरोधी उमेदवार मागील 5 वर्षे खासदार असताना केव्हाही कुठल्याही गावात गेला नाही. कुठलीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे विचार करुन मतदान करा.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. समोरचा आपल्या विरोधातील उमेदवार विनाकारक आपल्याला बदनाम करत आहे. आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे कुठलेही काम नाही, पाच वर्षांत ते मतदार संघात फिरकलेही नाहीत. यामुळे विनाकारण मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहे. पाणी, रस्ते, वीज हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी फक्त भाषणे ठोकून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला तुमच्या हक्काचा माणूस संसदेत पाठवणे गरजेचे आहे.

अजितदादा यांच्या माध्यमातून आपण राहिलेले प्रश्न सोडवून घेऊ. परवा दिवशी अजित दादा यांची सभा होणार आहे, या सभेला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे. आपल्या परिसरातील प्रश्न दिलीपराव वळसे पाटील, बापूसाहेब, अजित दादा व माझ्या माध्यमातून नक्की सोडविले जातील. आदरणीय मोदीजी पंतप्रधान होणार असल्यामुळे त्यांच्या विचारांचा खासदार जर संसदेत असेल तर आपले सगळे प्रश्न वेगाने सोडविले जातील. त्यामुळे मला म्हणजेच घड्याळाला मत म्हणजेच मोदीजी यांना मत. येत्या १३ तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करावे हीच विनंती करतो.” असेही आढळराव पाटील म्हणाले.

दरम्यान, आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी काठापुर, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, जांबूत, शरदवाडी, वडनेर, माळवाडी, आमदाबाद अशा गावात आपला प्रचार केला. त्यावेळी गावकऱ्यांकडून आढळरावांना मोठा प्रतिसाद बघायला मिळाला. तर काठापुर, पिंपरखेड,चांडोह, फाकटे, जांबूत, शरदवाडी, वडनेर, माळवाडी, आमदाबाद अशा सर्वच ठिकाणच्या ग्रामस्थांनी आढळराव दादांना मोठे मताधिक्य देण्याचा शब्द यावेळी दिला.

Leave A Reply

Translate »