“यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार”, आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळाराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोल्हे यांनी पराभव केला होता. मात्र यावेळी आढळराव पाटलांसोबत अजितदादा असल्याने शिरूरच्या लढतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल शिरूर लोकसभेसाठी महायुतीची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी महायुतीच्या सर्व नेत्यांनी आढळराव पाटलांच्या पाठीमागे उभे राहण्याचे चंद्रकांत पाटलांनी आवाहन केले. त्याआधी पेठ पंचायत समिती येथे आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.

यावेळी महायुतीच्या मार्गदर्शनाखाली समस्त कार्यकर्त्यांनी आढळरावांच्या विजयाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसून आले. तसेच जनतेच्या आशिर्वादाने व समस्त कार्यकर्त्यांच्या साथीने यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. 

तर दुसऱ्या बाजूला चाकण याठिकाणीही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की,  विरोधी पक्ष, जनतेला भूल देऊन अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे अस्तित्व पटवून देण्याचे प्रयत्न करत जनतेची दिशा भूल करू पाहतो आहे. जनहिताप्रती आपले कर्तव्य पार पडत जनतेला सत्यपरिस्थितीची जाणीव करून देण्याचे, महायुतीचे ध्येय समस्त कार्यकर्त्यांनी उराशी बाळगले आहे. यंदा योग्य आणि जनतेच्या विश्वासास पात्र असाच उमेदवार निवडून येणार असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »