प्रगत उपचारांनी ७४ वर्षीय रुग्णाने घशाच्या कर्करोगावर मात करत गमावलेला आवाज परत मिळाला
पुणे - पिंपरी-चिंचवड येथील ७४ वर्षीय रुग्णाने चौथ्या टप्प्यातील घशाच्या कर्करोगावर यशस्वी मात करत आपला आवाज पुन्हा मिळवला आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (ओएलसीसी) येथे करण्यात आलेल्या आधुनिक प्रिसिजन ऑन्कोलॉजी उपचारांमुळे हे शक्य झाले. या उपचारांमुळे केवळ कर्करोग बरा झाला नाही, तर रुग्णाचा स्वरयंत्र (लॅरिंक्स) वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे रुग्णाला पुन्हा नीट बोलता येऊ लागले असून तो आता आत्मविश्वासाने पुर्वीसारखे सामान्य जीवन जगत आहे.
या यशस्वी उपचाराबाबत आयोजित पत्रकार परिषदेला रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल आणि युनिट प्रमुख डॉ. संतोष साहू उपस्थित होते. त्यांनी या उपचारपद्धतीचे महत्त्व आणि रुग्णाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. ही घटना आधुनिक कर्करोग उपचारांमुळे रुग्णांचे आयुष्य कसे बदलू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
पूर्वी तंबाखूचे सेवन करणारे, पण इतर कोणताही गंभीर आजार नसलेले श्री जनार्दन उमाळे यांना सुरुवातीला आवाज हळूहळू बसू लागल्याचे जाणवले. त्याचसोबत मानेच्या उजव्या बाजूला वेदनारहित गाठ दिसून आली. सुरुवातीला त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही.
मात्र तीन महिन्यांत त्यांचा आवाज अधिकच कमजोर झाला. रुग्णाला मोठ्याने बोलणे कठीण झाले आणि साध्या संभाषणाने देखील त्याना थकवा येऊ लागला. हळूहळू त्यांनी लोकांशी बोलणे टाळण्यास सुरुवात केली आणि सामाजिक कार्यक्रमांपासूनही दूर राहू लागले. भीती, एकटेपणा आणि अस्वस्थता वाढत गेल्यानंतर अखेर त्यांनी वैद्यकीय मदत घेण्याचा निर्णय घेतला, जो रुग्णाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.
रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल म्हणाले, रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा त्याला सतत आवाज बसणे, गिळताना थोडा त्रास होणे आणि मानेवर स्पष्ट सूज दिसत होती. PET-CT तपासणीत उजव्या बाजूच्या पायरिफॉर्म सायनस भागात कर्करोग आढळला. ही गाठ स्वरयंत्रापर्यत पसरलेली होती आणि जवळच्या लिम्फ नोड्समध्येही कर्करोग आढळून आला. मात्र तो अजूनही इतर अवयवांपर्यंत पसरलेला नव्हता. या स्थितीमुळे अवयव जतन (organ-preserving) करणाऱ्या उपचारांची योजना आखणे शक्य झाले, असेही जसवाल यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञांच्या बहुवैद्यकीय समितीने (मल्टिडिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड) रुग्णासाठी मेडिकल केमो-रेडिएशन उपचार सुचवले.
रुग्णावर आधुनिक हेलिकल टोमोथेरपी आणि त्यासोबत सिस्प्लॅटिन केमोथेरपी करण्याचे ठरविले. आमचे प्रमुख उद्दिष्ट्य हे स्वरयंत्राचे जतन करणे आणि कर्करोगावर संपूर्ण नियंत्रण मिळवत रुग्णाचा गेलेला आवाज परत मिळवणे हा होता असे डॉ. जस्वाल यांनी स्पष्ट केले.
उपचारानंतर सुमारे १६ आठवड्यांत रुग्णाचा आवाज कर्करोग होण्यापूर्वीपेक्षा देखील अधिक स्पष्ट झाला, तसेच मानेतील लिम्फ नोड्स पूर्णपणे कमी झाले. सध्या रुग्णाच्या प्रकृती सुधारत दिसून येत आहे आणि तो व्यवस्थित बोलू शकतो.
डॉ. जसवाल पुढे म्हणाले, उपचारास विलंब झाला असता तर रुग्णाला त्याचा आवाज कायमचा गमवावा लागला असता. गिळताना अडचणी किंवा श्वसनासंबंधी गंभीर समस्येचा सामना करावा लागला असता.
उपचारानंतरच्या काळात रुग्णाला मऊ व द्रव आहार, गिळण्याचे व्यायाम, मौखिक स्वच्छता, तिखट व कडक पदार्थांचे सेवन टाळणे, जबडा व मान यांचे व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे, वजन नियंत्रित राखणे, भरपूर पाणी पिणे, नियमित हालचाल करणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना रुग्ण श्री जनार्दन उमाळे म्हणाले, मी कधीच पुन्हा नीट बोलू शकेन असे मला वाटत नव्हते. आज मी माझ्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी आधीसारखा गप्पा मारु शकतो, याचा खूप आनंद आहे. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग मला पुन्हा मिळाल्याचा मला आनंद होतो आहे.

Comments are closed.