डॉ. कोल्हे यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे, गेल्या पाच वर्षांत चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही – अजित पवार

मंचर : चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर लोकसभा मंतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी  लढत आहे. शिरूर चे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे माझ्यावर टीका करतात की, मी पालकमंत्री असताना त्यांनी माझ्याकडे मतदारसंघासाठी निधी मागितला; मात्र मी दिला नाही असे ते खोटे बोलत आहेत. त्यांना मतदारसंघापेक्षा मालिकेचे शूटिंग महत्वाचे आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांना चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवता आला नाही, वाहतूक कोंडीत लोकांचे दोन दोन तास वाया जात आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आढळराव पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ लोणी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, शिरदाळे तसेच सातगाव पठार, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथून आपल्या विचारांचा खासदार निवडून दिल्यास राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पाण्याच्या विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून पाणीप्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पवार यांनी दिले.

जुलैमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. त्यामुळे आंबेगावात ६०० कोटींची कामे मार्गी लावता आली. ८ दिवसांत हिरड्याच्या नुकसानीची १७ कोटींची भरपाई दिली. जिल्हा नियोजनमधून आंबेगावसाठी ६८ कोटी रुपये निधी दिला. सत्तेशिवाय काही उपयोग नाही, आम्ही जर सत्तेत नसतो तर ही कामे झाली असती का? असा सवाल उपस्थित करत भाजपा सोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. 

आढळराव पाटील म्हणाले, पंधरा वर्षे खासदार असताना व खासदार नसतानाही मी जनतेसाठी काम केले. जनतेच्या सुखदुःखात, लग्नाच्या, दशक्रियाच्या कार्यक्रमात सहभागी झालो, यात कमीपणा कसला? मी खासदार नसतानाही गावागावात निपी टाकण्यासाठी प्रयत्न केला आहे विविध विकासकामे मार्गी लावले आहेत. विद्यमान खासदारांना फोन केला की त्यांचे पीए उचलतात  व मीच खासदार बोलत आहे, असे सांगतात, खासदारांचा ८० सत्यांची टक्के निधी परत गेला, असे मी पेपरात वाचले. त्यामुळे जनतेने बिनकामाच्या खासदाराला घरी  बसवावे.

आपल्या खासदाराने त्यांच्या कोपरे या दत्तक गावाच्या तोंडाला पाने पुसली. पाणीटंचाईत तेथील महिलांना दोन ते अडीच किमी पायपीट करुन पाणी आणायला लागत असताना, त्यांनी गाव वाऱ्यावर सोडले. पण माझ्या संस्था आणि कार्यकत्यांकडून दोन महिन्यांपासून तेथे टैंकर सुरु आहे. त्यामुळे कोणतेही काम न करता, आरोप करणाऱ्या निष्क्रीय खासदाराला त्याची जागा दाखवायलाच लागेल. असे आढळराव पाटलांनी सांगितले.

Leave A Reply

Translate »