पार्टटाईम राजकारण आणि केवळ काम करण्याचा अभिनय – आढळराव पाटलांनी कोल्हेंवर घणाघाती टिका

शिरूर : गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात चांगलाच जोर घेतला आहे. अशातच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पाच वर्ष मागे गेला आहे. ज्या प्रश्नावर विद्यमान खासदारांनी मतं मिळवली, त्या सर्व समस्यांकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं. चाकण वाहतुकीच्या समस्येसंदर्भातही त्यांना काहीही करता आले नाही. पाच वर्षात एक रूपयाचेही काम केंद्रातून आणता आले नाही. आलेला निधीही पुर्ण खर्च करता आला नाही. ते पार्टटाईम राजकारण करत असून, जनसामान्यांच्या वेदनांशी त्यांची बांधिलकी नाही. ते केवळ काम करण्याचा अभिनय करत आहेत. अशी घणाघाती टिका शिवाजीराव आढळराव पाटलांनी कोल्हेंवर केली आहे.

बदलेल्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीची उमेदवारी नक्कीच फायद्याची ठरले, या मतदारसंघातील पाच आमदार राष्ट्रवादीचे असून एक भाजपचा आहे. राष्ट्रवादीची ताकद असल्यामुळेच महायुतीत राष्ट्रवादीही ही जागा सुटली आहे. भोसरी आणि हडपसरही माझ्या पाठीमागे उभे राहतील, असा मला विश्वास आहे. महायुतीत सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे त्याचा फायदा निश्चित होईल. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विद्यमान खासदाराने मतदारसंघात काहीच कामे केली नाहीत. त्यांनी केवळ काम केल्याचा अभिनय केला आहे. या लोकसभेला अभिनयाचा सेट बनवत जनतेच्या प्रश्नांकडे पुर्ण दुर्लक्ष केले आहे. खासदार नसताना मी गेल्या दीड दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जवळपास दीड हजार कोटी रूपयांचा निधी आणत ४५० गावांना वाटला आहे. मी केलेल्या कामाच्या दोन टक्केही कामे निवडून आलेल्या खासदारांना करता आली नाही. अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली.

Leave A Reply

Translate »