शिरूर लोकसभा – अमोल कोल्हे यांना उद्देशून गावांच्या वेशीवर ठिकठिकाणी बॅनर लागले, ‘तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात स्वागत

शिरूर : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिरूर मध्ये वातावरण आता चांगलेच तापू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत होत असून दोन्ही उमेदवारांकडून ठिकठिकाणी प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे.

मूळचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात अनेक गावांमध्ये ते फिरकले नसल्याचा आरोप आढळराव पाटील यांच्याकडुन नुकताच करण्यात आला होता, त्यातच आता अनेक गावांच्या वेशीवर “अमोलदादा, तब्बल पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत : आपलाच 2019 चा विश्वासू मतदार” अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

अमोल कोल्हे यांच्याबद्दल लागलेल्या बॅनर्स ची चर्चा सध्या शिरूर लोकसभेत सर्वत्र होत असून, गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क कमी असून नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यात ते कमी पडले असल्याच्या चर्चा अनेक गावांमध्ये आहे, त्याउलट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला असून नागरिकांचे प्रश्न समजून त्यांची कामे करण्याची आढळराव पाटील यांची भूमिका राहिल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कोरोना काळातही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अनेक गावांमध्ये नागरिकांना मदत पुरविल्याचे अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत. आता गावांच्या वेशीवर लागलेल्या खोचक स्वागताच्या बॅनर्स बद्दल अमोल कोल्हे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Translate »