लाखो पुणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या पीएमपीएमएल बस चालक-वाहकांचा सपत्नीक सन्मान, पाद्यपूजन करत हेमंत रासने यांनी व्यक्त केली कृतज्ञता

पुणेकरांच्या आवडत्या पुण्यदशम ‘दस मे बस’ योजनेची यशस्वी तृतीय वर्षपूर्ती

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या पुण्यदशम ‘दश मे बस’ उपक्रमाची तीन वर्षे यशस्वीपणे पार पडल्याच्या निमित्ताने आज बस चालक आणि वाहकांचे सपत्नीक पाद्यपुजन करत अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये बसची प्रतिकृती असणारा केक कट करत पुण्यदशम योजनेचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. पुणेकरांना स्वस्त दरामध्ये अवघ्या दहा रुपयांत दिवसभर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये फिरण्यासाठी रासने हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना ‘दस मे बस’ योजनेची सुरुवात झाली होती. यावेळी जेष्ठ शिक्षणतज्ञ मा.श्री. न म जोशी, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मा.श्री. मिलिंदजी काळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “स्वस्त, गतिमान, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा सुरक्षित प्रवास पुणेकरांना घडवा, या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी पुण्यदशम ‘दस मे बस’ योजनेची सुरुवात मी स्थायी समिती अध्यक्ष असताना करण्यात आली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीची कोंडी पार्किंगची समस्या, प्रदूषण, आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास या योजनेमुळे मदत झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये जवळपास १ कोटी प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. प्रवाशांना सेवा देण्याचे महत्त्वाचे काम बसचे चालक आणि वाहक करतात, त्यामुळे आजच्या दिवशी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे”.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न. म. जोशी म्हणाले, “लाखो पुणेकरांना दररोज बसचे चालक आणि वाहक सुखकर प्रवास घडवतात. त्यांच्या प्रती आपण कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही. मात्र रासने यांनी सन्मान करत त्यांचे सपत्नीक पाद्यपूजन केले यापेक्षा विलक्षण गोष्ट नाही. समाजातील प्रत्येक कष्टकऱ्यांचा आपण सन्मान केला पाहिजे”.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले की, “खरतरं पुण्यदशम ‘दस मे बस’ हि योजना हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून सुरु झाली, मात्र या गोष्टीचा त्यांनी गर्व न बाळगता हि योजना अमलात आणून तीन वर्ष ज्यांनी ती योग्यरीत्या राबवली असे वाहन चालक यांचा सन्मान केला ही कौतुकाची गोष्ट आहे. आजच्या बदलत्या समाजामध्ये कष्टकऱ्यांची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवली तर समाज एकसंधपणे बांधला जाईल. समाजामध्ये पडत असलेल्या अंतर देखील यामुळे थांबून जाईल.

यावेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक मा. सुलोचना कोंढरे, मा. अजय खेडेकर, मा. सम्राट थोरात, मा. विजयालक्ष्मी हरिहर, मा. आरती कोंढरे, मा. गणेश बिडकर, मा. राजेश येनपुरे, मा. अर्चना पाटील, मा. गायत्री खडके, मा. योगेश समेळ, मा. मनीषा लडकत, मा. उदय लेले, मा. सुनील खंडागळे, मा. छगन बुलाखे, मा. उद्धव मराठे, कसबा मतदारसंघासह सरचिटणीस राणी कांबळे, वैशाली नाईक, उमेश चव्हाण, अमित कंक, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पवार, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर तसेच इतर कसबा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
कसबा मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मतदारा नाव नोंदणी अभियानाचा देखील यावेळी शुभारंभ करण्यात आला. मतदार संघातील एकूण 27 ठिकाणी दोन्ही नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली आहे.

Leave A Reply

Translate »